भंडारा : जिल्ह्यात एका आदिवासी आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथील शाळेत हा प्रकरा घडला असून यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, ही आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालवली जाते. तसेच या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेत सुमारे ३२५ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थांपैकी तब्बल ३७ विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, उर्वरित ३३ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात जावून विद्यार्थ्यांची चौकशी केली.
नेमकं काय झालं?
विद्यार्थांना काल दुपारच्या जेवणात बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती देण्यात आलं. यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. काही विद्यार्थांना चक्कर आली. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडे केली असता याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
दरम्यान, सायंकाळनंतर विद्यार्थांना पोटदुखी आणि उलटीचा अधिकच त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ११ ते १७ या वयोगटातील ३६ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





