सावंतवाडी : तळकोकणातील सावंतवाडी व वेंगुर्ला ही शहरे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. समुद्र किनारपट्टी लाभल्याने निसर्ग सौंदर्याने नटलेली ही शहरे देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. दररोज हजारो पर्यटक या शहरांना भेट देत असल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मात्र सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या CCTV कमेऱ्यांपैकी तब्बल 51 कॅमेरे व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक किनारपट्टीवरील कॅमेरे बंद आहेत. नागरिकांची व पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी सर्व CCTV कॅमेऱ्यांचे लवकरात लवकर मेंटेनन्स ऑडिट करावे व नादुरुस्त असलेले CCTV कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चनाताई घारे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी CCTV च्या मेंटेनन्स ऑडिट सह 150 अतिरिक्त CCTV कॅमेरे प्राधान्याने बसवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड .रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, सावंतवाडी तालुका युवक उपाध्यक्ष विवेक गवस, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, अल्पसंख्याक सेल महिला तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, गौरांग शेर्लेकर, वैभव परब, शेखर परब, प्रकाश म्हाडगुत आदी पदाधिकारी उपस्थित होते.





