दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाची झडप ; भीषण अपघातात तीन ठार, दोन जण जखमी.

111

हातकणंगले : पहिल्या श्रावण सोमवारी रामलिंग धुळोबा मंदिराकडे दर्शनासाठी भाविकांना घेऊन निघालेली रिक्षा आणि भरधाव एसटी बसची जोरदार धडक झाली. त्यात रिक्षांतील तिघे ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता अंतराज खत्री (४०) आणि श्रीतेज विलास जंगम (९, सर्व रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक प्रशांत पेटकर व कियान घेवरचंद खत्री गंभीर जखमी आहेत. त्यांना खासगी इस्पितळात दाखल केले आहे.

कोल्हापूर-सांगली महामार्गावर रामलिंग फाट्यावर सायंकाळी अपघात झाला. अपघातस्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इचलकरंजी येथील रिक्षाचालक प्रशांत पेटकर रिक्षा (एम एच ०९ जे ८९८९) मधून दोन महिला व दोन लहान मुलांना घेऊन श्रावण सोमवार निमित्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराकडे निघाले होते. ते सायंकाळी हातकणंगलेहून महामार्गावरून रामलिंग फाट्याकडे वळण घेत होते. त्यावेळी कोल्हापूरहून आलेल्या कुडाळ-पंढरपूर एसटी (एमएच १- बीटी- २५०९) आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. त्यात रिक्षामधील शिवानी आणि श्रीतेज दोघे जागीच ठार झाले. गंभीर जखमी ललिता यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी पेटकर यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले होते. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनी एस. टी. चालक रवींद्र प्रभाकर चव्हाण (रा. पंढरपूर) यांना ताब्यात घेतले आहे.

धोकादायक वळण…

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरून रामलिंग तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे; मात्र दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने आणि रामलिंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांमुळेचे नेहमीच अपघात होतात. त्यामुळे रामलिंग फाटा येथील वळण धोकादायक ठरले आहे. या अपघातातील मृत ललिता आणि शिवानी या सख्ख्या जावा आहेत.