क्रांतिदिन विशेष….नेमकं काय होतं ऑगस्ट क्रांती आंदोलन ..?

75

आजपासून ८२ वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत अचानक खळबळ उडाली. मुंबईसह संपूर्ण देशात पोलिसांच्या धाडी सुरु झाल्या आणि पहाटेपर्यंत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पटेल, मौलाना आझाद यांच्याबरोबर अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये हलवण्यात आलं तर इतर नेत्यांना इहमदनगरच्या किल्ल्यातील तुरुंगात डांबण्यात आलं. जणू ९ ऑगस्टला असं काही तरी घडणार होतं ज्याची ब्रिटिशांना आधीच धास्ती भरली होती. तो दिवस होता ‘ऑगस्ट क्रांती दिन’ आणि ‘भारत छोडो आंदोलन’.

आपण भारताला स्वतंत्र तरी करूया किंवा या प्रयत्नात बलिदान तरी देऊयात. ‘करो या मरो’ हा मंत्र महात्मा गांधींनी देशवासियांना दिला. या मंत्राने भारतीयांमध्ये चेतना संचारली आणि ब्रिटिश सत्तेवर शेवटचा आघात सुरु झाला.

गांधीजींनी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली. आणि ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळायचं ठरलं. हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ म्हणून ओळखला जातो.

‘ऑगस्ट क्रांती’ काय होती? या क्रांतीचं महत्व काय?

ब्रिटिशांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रत्येक भारतीय आतुर होता. त्याच वेळी ‘करो या मरो’ या मंत्रासह महात्मा गांधींनी या स्वातंत्र्याच्या अंतिम संघर्षाची ठिणगी पेटवली. आयुष्यभर अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्या गांधींनीच ‘करो या मरो’ हा मंत्र दिल्याने प्रत्येक भारतीयामध्ये एक उत्साह संचारला होता. लढण्याची उम्मेद निर्माण झाली होती. कोट्यावधी भारतीय त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले. ऑगस्ट क्रांती हे असं व्यापक जनआंदोलन होतं ज्याने ब्रिटिशांच्या सत्तेला हादरा दिला.