मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बदलत आहे. विकास कामाच्या उद्घाटनाला आज त्यांचा मुंबई दौरा आहे त्याला कोणताही रंग देऊ नये. गेल्या 8 वर्षात विकास करण्यात मोदी सरकार अग्रेसर आहे. भाजपा निवडणुका आल्यावर कधीच तयारीला लागत नाही. प्रत्येक दिवशी भाजपा तयारीत असते. भाजपाचा कार्यकर्ता कायम कामात असतो. ग्रमीण भागातील कार्यकर्त्यापासून केंद्रातील नेत्यांपर्यंत झोकून देऊन काम करतात. लोकांची गरज काय ते ओळखून काम केले जातयं. विरोधकांना दुबळे न समजता कामाला लागा असा संदेश मोदींनी दिला असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. आज ते कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत होते. बारामतीत थोडक्या मतांनी जागा गेली होती,आगामी लोकसभा निवडणुकीत 48 जागा जिंकण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
पार्थ पवारांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली याविषयी बोलताना पडळकर म्हणाले की, या दोघांनी भेट का घेतली हे मला माहित नाही. पार्थ पवारांच्या मनात अस्ववस्था आहे. कारण त्यांचे दुसरे बंधू रोहित पवार दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या मतदार संघात जाऊन विधानसभेचे सदस्य झाले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. बारामती अॅग्रो त्यांच्या ताब्यात आहे, याची खंत त्यांच्या मनात असेल. त्यांच्याच जिल्ह्यात लोकसभेला त्यांचा पराभव झाला, त्यामुळे राजकीय स्थिरता मिळावी यासाठी प्रयत्न करत असतील. घरामध्ये आजोबांच्याकडून अन्याय होतोय याचीही खंत असेल म्हणूनच त्यांनी भेट घेतली असावी असेही ते म्हणाले.




