नाशिक : राज्यातील लालपरी लाखो प्रवाशांचा आधार बनली आहे. विविध सवलतींच्या घोषणेनंतर लालपरीला चांगले दिवस आले आहेत. रेल्वेप्रमाणे एसटी बसमध्ये देखील काही फुकटे प्रवासी असतात. बसने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवा, यासाठी राज्यात ३५ विभागीय स्तरावर, तर शंभर उपविभागांत तिकीट तापसणाऱ्या पथकांची नियुक्ती एसटी महामंडळतर्फे करण्यात आली आहे.
या पथकांतर्फे वर्षभरात सुमारे १२ लाख बसची तपासणी करण्यात आली. तपासणीत सहा हजार ५८९ फुकटे प्रवासी मिळून आले. त्यांच्याकडून प्रवास भाडे व दंड स्वरूपात १५ लाख ९४ हजार ११४ रुपये वसूल करण्यात आले.
राज्य सरकारने एसटी बसमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिलांना पन्नास टक्के तिकिटात सूट दिली आहे. यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली आहे. गर्दीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप देण्यासाठी राज्यात १३५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पथक शहरासह महामार्गाच्या ठिकाणी बसची तपासणी करतात. रोज एसटी बसमध्ये सुमारे ५५ लाख प्रवासी वाहतूक करतात. राज्य सरकारने तिकिटात सवलत देऊनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली नाही.
राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, अहमदनगर, जळगाव, बीड, परभणी, बुलडाणा, चंद्रपूर, अकोला या विभागांतून सर्वांत जास्त अमरावती जिल्ह्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ११ लाख ९१ हजार ४४८ राज्यभरात बसची तपासणी करण्यात आली. बसबरोबरच सहा लाख ११ हजार ७६३ वाहकांची तपासणी झाली. या तपासणीतून भाडे न घेता तिकीट देणे, कमी भाडे, जुन्या तिकिटांची विक्री, कमी व जादा रक्कम अशी वर्षभरात २५ हजार २५७ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
यातून १५ लाख ९४ हजार ११४ भाडे व दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. वर्षभरात सहा हजार ५८९ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आहे.
तपासणी पथकाच्या माध्यमातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर वचक राहतो. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तोटा कमी होतो.





