सावंतवाडी : सावंतवाडी आगाराच्या दोनबसमध्ये अपघात झाला होता. बसच्या अपघातामध्ये खरोखरच चालकाची ‘चूक आहे की गाडी मधील नादुरुस्तपणा हे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे जोपर्यत झालेल्या अपघातग्रस्त बसचा आरटीओमार्फत परीक्षण होऊन बसेस या रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत दोन्ही बसच्या चालकांवर खात्याअंतर्गत कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ नये. तसेच त्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली शिक्षा देऊन त्यांच नाहक मानसिक खच्चीकरण करू नये, संबंधित चालकांवर कोणतीही चुकीची कारवाई झाल्यास होणाऱ्या परिणामास बसच्या अपघाताचा पंचनामा करणारा अहवालकर्ता जबाबदार असेल, असा कडक इशारा युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिला आहे
दरम्यान, अपघातग्रस्त बस या प्रवासी वाहतूकीसाठी तशाच स्थितीत पाठवल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचा जीवास धोका निर्माण होऊ शकतो. या अपघाताना बांधकाम विभाग देखील तेवढाच जबाबदार आहे. रस्त्यावर वाढलेली झाडांच्या फांद्या दूर करणं ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु ते होत नसल्यानं असे अपघात होत आहेत. तर यापुढे अशा अपघातग्रस्त बस प्रवासी सेवेत दिसल्यास त्या जाग्यावर रोखल्या जातील असा इशारा सागर नाणोसकर यांनी दिला. यावेळी अजित सांगेलकर व युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





