दबदबा अन् दरारा..! फलंदाजांनी रचला पाया, गोलंदाजांनी चढवला कळस!

72

त्रिनिदाद : भारताने वेस्ट इंडीजचा तिसऱ्या वनडे सामन्यात 200 धावांनी पराभव करत मालिका 2 -1 ने खिशात टाकली. भारताचा हा विंडीजवरील सलग 16 वा मालिका विजय आहे. पहिल्या दोन वनडे सुमार फलंदाजी करणाऱ्या भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात मात्र आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी केली.
भारताने ठेवलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 35.3 षटकात 151 धावात गारद झाला. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. या दोघांना कुलदीप यादवने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. विंडीजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक 39 धावा केल्या.
भारताने ठेवलेल्या 352 धावांच्या विशाल टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीज संघाची अवस्था पहिल्या पहिल्या 7 षटकात 3 बाद 17 धावा अशी झाली. भारताचा नवखा गोलंदाज मुकेश शर्माने किंग, मेयर्स आणि होप हे तीन अव्वल मोहरे टिपत दमदार सुरूवात केली.

यानंतर जवळपास 10 वर्षांनी आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळणाऱ्या जयदेव उनाडकटने केसी कार्टेला 6 धावांवर बाद करत विंडजीला अजून एक धक्का दिला. या हादऱ्यातून विंडीज सावरण्याचा प्रयत्न करण्याच्या आतच शार्दुल ठाकूरने विंडीजवर आपला कहर बरसवण्यास सुरूवात केली.

त्याने स्टार शिमरॉन हेटमायरला अवघ्या 4 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे विंडीजची अवस्था 5 बाद 40 धावा अशी झाली.

विंडीजने आपले अर्धशतक पार करायच्या आतच शार्दुल ठाकूरने रोमारियो शेफर्डची शार्दुल ठाकूरने शिकार केली. विंडीजची अवस्था 6 बाद 50 धावा अशी झाली. यानंतर एक बाजू लावून धरलेल्या अलिक अथनाजेला कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. अथनाजेने 32 धावांचे योगदान दिले. यानिक करिया देखील 19 धावा करून बाद झाला. त्यालाही कुलदीपनेच पॅव्हेलियनमध्ये धाडले. विंडीजचे 8 फलंदाज 88 धावात पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर विंडीज 100 च्या आत गाशा गुंडाळणार असे वाटत होते. मात्र तळातील फलंदाज अल्झारी जोसेफ (26) आणि गुडाकेश मोती (39) यांनी नवव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी रचली.