- मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ८ आमदारांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजप खासदाराने मोठा दावा केला आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील’, असा दावा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असा गौप्यस्फोटही निंबाळकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
तर पुढे निंबाळकर म्हणाले की, ‘काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल’, असंही निंबाळकर म्हणाले आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे लोकार्पण सोहळा खासदार निंबाळकर यांच्या आणि माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.





