मोठे होण्यासाठी विद्यार्थी दशेतच झिजावे.! – प्रा. राजाराम परब यांचे आरपीडी प्रशालेत व्याख्यान

87

सावंतवाडी : जगात मोठं व्यक्तिमत्व असलेली माणसं आपल्या विद्यार्थी दशेतच झीजलेली आहेत, यश मिळविण्यासाठी बालपणी प्रचंड घाम गाळावा लागतो तरच यशाची चव चाखता येणे शक्य होते, असे मत परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब यांनी व्यक्त केले.

आज येथील आरपीडी स्कूलमध्ये प्रा. राजाराम परब यांनी ‘विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्सची उपयोग्यता’ या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नीट, जेईई, सीईटी, तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर फाऊंडेशन कोर्स महत्त्वाचा आहे. कारण स्पर्धा परीक्षातील यशाचे खरे रहस्य हे फाऊंडेशन कोर्समध्ये दडलेले आहे, असेही मत प्रा. राजाराम परब यांनी आरपीडी प्रशालेत आयोजित सेमिनारमध्ये व्यक्त केले.

प्रारंभी स्कूलच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी गुलाबपुष्प देऊन प्रा. राजाराम परब, प्रा. रुपेश पाटील व परफेक्ट अकॅडेमीच्या टीमचे स्वागत केले.
सेमिनारमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रा.राजाराम परब यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई व सीईटी यांसारख्या अवघड परीक्षा व्यवस्थितपणे क्रॅक करण्यासाठी फाऊंडेशन कोर्स कशा पद्धतीने गरजेचा आहे, हे समजावून सांगितले.
प्रा. परब यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांचे हसत खेळत सहजरित्या उद्बोधन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील प्रा. परब यांना आपल्या मनातील शंका विचारत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा व त्यासाठी लागणारी तयारी यांबद्दल चर्चेद्वारा संवाद साधला. प्राध्यापक परब यांनी देखील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करीत सेमिनार यशस्वीरित्या संपन्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी केले.
यावेळी प्रशालेतील इयत्ता सहावी ते नववीचे विद्यार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेमिनार यशस्वी करण्यासाठी परफेक्ट अकॅडेमी टीमचे ओमकार मांजरेकर, मंदार सर्वेकर, अक्षय कानडे, आशिष सावंत यांनी परिश्रम घेतले.