Home ढाका थरारक…4 चेंडू, 1 धाव अन् 1 विकेट… भारत ना जिंकला ना हरला...

थरारक…4 चेंडू, 1 धाव अन् 1 विकेट… भारत ना जिंकला ना हरला | सामन्यासह मालिकाही ‘विभागून’

25

ढाका : भारतीय महिला क्रिकेट संघ हा जागतिक महिला क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला तगडे आव्हान देणारा संघ म्हणून ओळखला जातो. मात्र आज बांगलादेश महिला क्रिकेट संघाने भारताच्या या स्टार संघाला पाणी पाजले.
ढाका येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील महिला क्रिकेट संघात झालेला तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा टाय झाला. मालिकेतील एक सामना भारताने तर एक समना बांगलादेशने जिंकल्यामुळे मालिकेचे विजेतेपद दोन्ही संघांमध्ये विभागून देण्यात आले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फरगना हक (107) आणि शमिमा सुल्ताना (52) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतासमोर 50 षटकात 4 बाद 226 धावांचे आव्हान उभे केले. मात्र भारताला 49.3 षटकात सर्वबाद 225 धावाच करता आल्या.
भारत सामन्याच्या 40 व्या षटकापर्यंत सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण करून होता. भारताने 4 बाद 191 धावांपर्यंत मजल मारली होती. हरलीन देओल 77 धावा करून खेळत होती. भारत सामना आरामात जिंकणार असे वाटत असतानाच बांगलादेशने अवघ्या 34 धावात भारताचे सहा फलंदाज बाद केले.
बांगलादेशकडून नाहिदा अकतरने 3 तर मारूफा अकतर 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशची सलामीवीर फरगना हक ही बांगलादेशकडून वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
शेवटच्या षटकात चार चेंडूत विजयासाठी एक धावेची गरज असताना भारताची शेवटची फलंदाज मेघना सिंह बाद झाली. याच षटकात शेवटपर्यंत झुंज देणाऱ्या जेमिमाहने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली अन् भारताने बांगलादेशच्या धावसंख्येशी बरोबरी केली होती. मात्र पुढच्याच चेंडूवर मारूफा अखतरने भारताची शेवटची फलंदाज मेघना सिंहला झेलबाद केले.

जेमिमाह रॉड्रिग्सने नाबाद 33 धावांची खेळी केली. मात्र तिला सामना फिनिश करता आला नाही. तिने तळातील फलंदाजाकडे स्ट्राईक देण्याची चूक केली. भारताकडून स्मृती मानधनाने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र भारताच्या मधल्या फळीने ऐनवेळी कच खालली.