बंगळूरुः देशातील विरोधकांची बैठक बंगळूरु येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी बोलतांना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, विरोधकांच्या या आघाडीला ‘इंडिया’ असं नाव देण्यात आलेलं आहे. भाजप सरकारने लोकाशाहीविरोधी कृत्यं केलेली आहेत. विरोधकांना संपवण्यासाठी तपास यंत्रणांना गैरवापर भाजपकडून होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
दरम्यान, ‘इंडिया’ची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. विरोधकांमध्ये समन्वय साधण्यासाठी ११ जणांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. एनडीएमध्ये ३८ पक्ष अल्याचा दावा करणाऱ्या भाजपविषयी बोलतांना खर्गे म्हणाले की, एवढे पक्ष आणले कुठून? हा प्रश्न आहे. नोंदणीकृत पक्षांचा अंदाज घेतल्यास हे शक्य नसल्याचं खर्गेंनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरणार असल्याची माहिती आहे. विरोधकांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल चर्चा झाली. मात्र त्यावर निवडणुकीनंतर बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आल्याचं यावेळी खर्गे यांनी सांगितलं.





