दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग…!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या दरम्यान होईल. याच पार्श्वभूमीवर परीक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी पहिल्यांदाच पुणे बोर्डाने नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाहीत.

 राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा पार पडेल. दरम्यान खासगी शाळा-महाविद्यालयांच्या अनेक तुकड्या पटसंख्येअभावी बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त झाले असून त्यांची पदे रद्द करावी लागली आहेत. भविष्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये पटसंख्या कमी होऊ नये म्हणून काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्या जातात. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.

या पार्श्वभूमीवर पुणे बोर्डाने नवतंत्रज्ञानाचा वापर करून 10 वीचे 17 लाख आणि 12 वीचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यासाठी नऊ हजार केंद्रे असणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची बाब खर्चिक असल्याने सध्या परीक्षकांच्या मोबाईलवर झूम कॉल करुन परीक्षा हॉलमधील तीन तासांचे शुटिंग केले जाणार आहे. यामध्ये परीक्षा सुरु झाल्यापासून उत्तरपत्रिका संकलित करेपर्यंतचे परीक्षकांच्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग केले जाणार आहे.