काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागील पीडा काही कमी होताना दिसत नाही. मोदी आडनाव प्रकरणी आधीच राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे , त्यानंतर त्यांनी संसद सदस्यत्व सुदधा गमावले आहे . आता राहुल यांच्यावर आणखी एका प्रकरणाची टांगती तलवार सुरू झाली आहे. सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींना दिला आहे.
हिंदुत्ववादी विचारवंत वीर दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावरकर म्हणाले की, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे पुरावे राहुल गांधींनी द्यावेत. सावरकर नसल्यामुळे माफी मागणार नाही असे राहुल गांधी सांगत आहेत. मी त्यांना आव्हान देतो की सावरकरांच्या माफीचा कोणताही पुरावा दाखवा. ते पुढे म्हणाले की, ‘राहुल गांधी राजकारणासाठी सावरकरांचे नाव कसे बदनाम करत आहेत हे पाहून खरोखरच वाईट वाटते. ते मुस्लिमांचेही ध्रुवीकरण करत आहेत असे दिसते. महाराष्ट्रातही सावरकरांच्या नावावर राजकारण केले जात आहे. सावरकरांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
रणजित सावरकर यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सावरकरांबद्दल आदर असेल, पण जोपर्यंत ते सावरकरांना पाठिंबा दर्शवत नाहीत, तोपर्यंत काही अर्थ नाही. अल्टिमेटम देऊनही काँग्रेस थांबली नाही आणि त्यांनी (उद्धव ठाकरे गटाने) अद्याप काँग्रेसची साथ सोडलेली नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांनाही सावरकरांबद्दल नितांत आदर आहे, पण त्यांनी यापुढे जाऊन राहुल गांधींना सावरकरांबद्दल केलेल्या आतापर्यंतच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगावी.’ याची पार्श्वभूमी अशी की , 25 मार्च रोजी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, ते मोदी सरकारला घाबरणार नाहीत, सरकार त्यांना घाबरवू शकत नाही. सुरतमधील गुन्हेगारी बदनामी प्रकरणात त्यांनी सरकारची माफी मागितलेली नाही कारण त्यांचे नाव गांधी आहे, सावरकर नाही आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावर सावरकरांच्या नातवाने देशभक्तांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे चुकीचे असून याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली.





