शरद पवारांचा पाठींबा होता…?
पुणे : महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी खूप गाजला. राज्यासह देशात गाजलेल्या या शपथविधीबाबत अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडले आहे. आतापर्यंत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच्या वेळेस राजभवनात घेतली होती.
राज्याच्या राजकारणात त्यावेळी खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी हा शपथविधी शरद पवारांच्या संमतीने झाला होता याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांनी या विषयावर बोलणे टाळले होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली होती. आता अखेर शरद पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे.
शरद पवार हे पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, असे विधान पवार यांनी केली आहे.
पवार यांच्या विधानानंतर आता आणखी चर्चांना उधाण आले आहे. मुळात पवार यांनी सारे काही स्पष्ट सांगितलेले नाही. केवळ त्यांच्या एका विधानामुळे विविध अर्थ काढले जात आहेत. पवार यांना या विधानाद्वारे काय सूचवायचे आहे, पहाटेच्या शपथविधीमागे पवार हेच होते का, यासह इतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीने झाला होता का ? ही बाब मात्र अद्यापही गुलदस्त्यात राहिली आहे .





