सावंतवाडी : तालुक्यातील वर्षा पर्यटनाची राजधानी असलेले आंबोली बदनाम होत चालले आहे. आंबोलीचा व्यवसाय संपत चालला आहे. पर्यटनावरती याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. गोव्यातून एका महिलेचे प्रेत आंबोली घाटात टाकलं जातं, सिंधुदुर्ग पोलीस काय करत होते? असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येताना तीन चौकशी पोस्ट पार करून यावे लागते. यापूर्वी आम्ही आंबोली येथील आंबोली-आजरा, आंबोली-बेळगाव तिथे वरती चेक पोस्ट बसवण्याची मागणी केली होती, काही दिवस हा चेक पोस्ट सुरू होता. आता बंद आहे. पर्यटनाच्या मोठमोठ्या वल्गना केल्या जातात, परंतु आंबोली पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न तगायत झालेले नाहीत. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांनी त्याची चौकशी करावी आणि चेक पोस्ट काय मलिदा खाण्यासाठीच आहेत काय? याचेही वस्तुनिष्ठ उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावं, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.





