देवगड कळाशी समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली त्रिवेणी बोट बुडाली, २०-२५ लाखांचे नुकसान
खलाशी सुखरूप, मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका ; देवयानी बोटीच्या तांडेलाने केली जीव वाचवण्याची धडपड
देवगड तालुक्यातील कळाशी समुद्र परिसरात गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेली श्री. राजेंद्र बाळकृष्ण भिलारे यांची “त्रिवेणी” (नोंदणी क्रमांक: IND-MH-5-MM732) ही मासेमारी बोट वादळी वाऱ्यामुळे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे बोटीसह त्यावरील साहित्याचे अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, बोटीवरील सर्व ६ खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या वादळी वाऱ्याच्या सूचनेनंतर त्रिवेणी बोट देवगड बंदराकडे परत येत होती. मात्र, कळाशी परिसरात अचानक तीव्र वादळी वारे सुरू झाल्याने बोटीच्या खालील बाजूचे दोन फळी निघून गेले आणि बोटीत पाणी शिरले, असे बोटीचे तांडेल श्री. बसप्पा कुरे (वय ४३) यांनी सांगितले.
त्यांनी तात्काळ वायरलेसद्वारे जवळील “देवयानी” या बोटीला मदतीसाठी संपर्क साधला. देवयानी बोटीच्या तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास रस्सीच्या सहाय्याने त्रिवेणी बोटीवरील तांडेलासह ६ खलाशांना सुखरूप बाहेर काढले.
या घटनेत बोट पूर्णपणे बुडाल्याने ती वाचवणे शक्य झाले नाही. बोटीवर ३ बॅरेल डिझेल, ४ डिस्को जाळे, वायरलेस उपकरण, आउटर बोर्ड (पाटे), टप, गॅस सिलिंडर, भांडी, दोरी आणि अंदाजे ३० क्रेट यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे बोटीचे मालक श्री. राजेंद्र भिलारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांनी सागरी सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी भेट देऊन मालक आणि खलाश्यांची विचारपूस केली.
त्यांनी घटनेची सविस्तर माहिती गोळा करून दिनांक १९/०९/२०२५ रोजी सकाळी मोका पंचनामा केला. सदर अहवाल, बोटीची कागदपत्रे आणि छायाचित्रांसह मा. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मालवण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हवामान सूचनांचे काटेकोर पालन आणि सागरी सुरक्षा उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.