दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदावरुन मुक्त करण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर नवे राज्यपाल कोण येणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असतानाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले. मात्र नुकतेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी महाराष्ट्राच्या राज्यापालपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पून्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोश्यारी आणि मविआ सरकारमध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळाला. त्याच बरोबर कोश्यारी आणखी एकाबाबतीत खुपच वादग्रस्त ठरले ते म्हणजे महारपुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्ये. कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मविआ सरकार पडल्यानंतर देखील कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड टीकेचे धनी झाले. दरम्यान त्यांनी स्वत:च राज्यपालपदावरुन पदमुक्त होण्याची विनंती पंतप्रधानांकडे केल्यानंतर नव्या राज्यपालांच्या नावाबाबत चर्चा रंगली. यामध्ये प्रामुख्याने कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव आघाडीवर होते.
मात्र गुरुवारी ( दि. २ ) रोजी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. कॅप्टन यांनी या चर्चेचे खंडन करताना म्हटले की, ही सर्व चर्चा काल्पनिक आहे. याला कोणताही आधार नाही. याबाबत मला काहीही माहिती नाही. तसेच याबाबतीत कोणीही माझ्यासोबत अद्याप चर्चा केलेली नाही. मी या आधीच पंतप्रधान मोदी यांना सांगितले आहे की, मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला जे वाटते, तेथे मी काम करण्यास तयार आहे.
आता कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या चर्चेचे खंडण केले असले तरी, पंतप्रधानांची मी जेथे काम करावे अशी इच्छा असेल तेथे काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मोदींच्या मनात काय आहे यावर सर्व अवलंबून असल्याचे देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. सन २०२२ मध्ये काँग्रेसची साथ सोडल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह य़ांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करत ते भाजपमध्ये सहभागी झाले.





