अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये उद्या क्रिकेट वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. हा सामना जिंकत वर्ल्डकप कोणाचा होईल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भारताचाच विजय होईल असा ठाम विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यातच ‘अॅस्ट्रोटॉक’चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी देखील एक मोठा दावा केला आहे. जर भारतानं वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली तर कंपनीकडून युजर्सना १०० कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. पुनीत गुप्तांनी म्हटलं की, “गेल्यावेळी मी माझ्या काही मित्रांसोबत वर्ल्डकपचा आनंद लुटला होता. पण यावेळी माझ्यासोबत आमचे युजर्स आहेत. ते देखील मला मित्रांसारखेच आहेत. त्यांच्यासोबत आनंद लुटण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळं आज सकाळी मी माझ्या फायनान्स टीमसोबत चर्चा केली आणि आपल्या युजर्सना १०० कोटी रुपयांचं वाटप करण्याची शपथ घेतली. जर भारत वर्ल्डकप जिंकला तर युजर्सच्या वॉलेटमध्ये पैशांचं वाटप केलं जाणार आहे.”

२०११ च्या आठवणी झाल्या ताज्या –
दरम्यान, पुनीत गुप्तानं सन २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये पुनीत गुप्ता यांनी लिहिलं की, गेल्यावेळी भारतानं २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळचा सामन्यातील थरारही त्यांनी सांगितला. सामन्याच्या पूर्वसंध्येला आम्ही नीट झोपूही शकलो नव्हतो. संपूर्ण रात्रभर आम्ही सामन्याच्या रणनितीवर चर्चा करत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.





