मुंबई : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत पुढील चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. सरकारने यासाठी चार मंत्र्यांची नावेही निश्चित केली आहेत. आज संध्याकाळपर्यंत चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
या चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ –
जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे.चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या मंत्र्यांच्या शिष्टमंडळात उदय सामंत, शंभूराजे देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आजच शिष्टमंडळ रवाना होणार आहे.
दोनदा मुहूर्त देखील हुकला –
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, सोमवारी एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती खुद्द जरांगे यांनी दिली होती. मात्र, काही कारणास्तव शिष्टमंडळाचा हा दौरा रद्द झाला. त्यानंतर 7 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी हे शिष्टमंडळ येत असल्याची माहिती जरांगे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेल्याने शिष्टमंडळाचा दौरा पुन्हा रद्द करण्यात आले. त्यानंतर हे शिष्टमंडळ आज सकाळी येणार असल्याची चर्चा होती. परंतु, सकाळी येऊ न शकलेलं हे शिष्टमंडळ संध्याकाळी 5 वाजता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत दोनदा मुहूर्त हुकेलेलं शिष्टमंडळ संध्याकाळी पोहचते का? हे पाहणं महत्वाचे असेल.
शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्ड देण्याची शक्यता –
मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा म्हणून, जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी सरकारच्या वतीने टाईम बॉन्डबाबत देण्याचं देखील ठरले होते. त्यानुसार, आज जरांगे यांच्या भेटीला येणारं शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्ड देण्याची शक्यता आहे. ज्यात, जरांगे यांनी उपोषण मागे घेतांना आरक्षण कशा पद्धतीने दिले जाईल, यासाठी सरकार काय-काय करणार, आरक्षणाचा आदेश कधी काढला जाईल, तसेच आरक्षण देतांना याच लाभ कुणाला घेता येईल, याबाबत लेखी माहिती असणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत आमचे काम, आंदोलनाची पुढची दिशा याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. सरकार ही जोरात काम करत असून ते त्यांच्या शब्दावर ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हटले. ओबीसी बाबत नेते एक येत आहेत. मात्र सामान्य बांधव कुणाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी म्हटले. मराठा समाज आणि ओबीसी बांधवात भांडण लावण्याचे काम पुढारी करत आहेत. सामान्य माणूस त्यात नाही असा आरोपही त्यांनी केला. आम्ही पूर्वीपासून कुणबी आहोत आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला सरकार त्यातून प्रमाणपत्र देत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. ओबीसी नेत्यांचा दबाव असल्याने आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही. मात्र आता सरकार दडपणातून बाहेर पडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार; जरांगेंचं सर्वात मोठं वक्तव्य –
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र, यावर आज मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं थेटच जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.



