रोहा : शशिकांत मोरे
रोहा येथे कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हास्तरीय कवी संमेलन दिमाखदारपणे संपन्न झाले. रोहा शाखा आयोजित कवी संमेलनात दिग्गज कवी, गझलकार यांनी कविता, मुशायरा सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. चांदण्या तारे नभीचे आज आले पाहुणे, अंगणी बरसून गेले कवितांचे चांदणे म्हणत कोमसापचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन अतिशय उत्साहात पार पडले. काव्यसंमेलन व गजल मुशायरा असा हा संलग्न कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोहा कोमसाप रोहा शाखेचे सर्व सदस्य, मान्यवर निमंत्रित जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ सदस्य एल बी पाटील, जिल्हा समन्वयक अ.वि. जंगम, मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, गझलकारा ज्योत्स्ना रजपूत गडकिल्ले अभ्यासक सुखदज राणे तसेच कोमसाप शाखांचे अध्यक्ष, निमंत्रीत कवी गजलकार, सर्व रसिक श्रोत्यांच्या तसेच नगरपालिका कै. प्रफुल्ल शेठ बारटक्के शाळा क्रमांक १० च्या विद्यार्थ्यांच्या समवेत ग्रंथ दिंडी व साहित्य पालखीचे आयोजन करण्यात आले. हरी नामाच्या गजरात साहित्य पालखी व्यासपीठाकडे आणण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वागत समारंभ सुरू झाला .
काव्य संमेलनाचे प्रास्ताविक रोहा शाखेच्या अध्यक्षा संध्या विजय दिवकर यांनी केले. मनोगत गडकिल्ले अभ्यासक सुखद राणे यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांनी संपूर्ण कोकणात वसई ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यात कोकण मराठी साहित्याच्या अनेक शाखा निर्माण केलेल्या आहेत या शाखातून लिहीत्या हातांना व्यासपीठ मिळवून देणे, नवनवीन साहित्य निर्मिती निर्माण करणाऱ्या कवी लेखकांसाठी निरनिराळ्या विषयांवरील व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करणे. कवीसंमेलन आयोजित करणे इत्यादी कार्य सातत्याने चालू असते. आपल्या रायगड जिल्ह्यात एकूण पंधरा शाखा आहेत. साहित्य विषयक वेगवेगळे उपक्रम सर्व शाखांतर्फे नेहमीच होत असतात. प्रत्येक तालुक्याची युवाशक्ती युवकांना लिहीते करण्यासाठी काम करत असते . आयोजित कवितांचे चांदणे या काव्य संमेलनासाठी पाली सुधागड शाखेचे धनंजय गद्रे गुरुजी, महाड शाखेचे गंगाधर साळवी , तळा इंदापूर शाखेचे हेमंत बारटक्के इत्यादींनी आपली उपस्थिती नोंदवली. जिल्हा समन्वयक अ वि जंगम यांनी तसेच मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी रोहा शाखेचे कौतुक करून आपले मनोगत मांडले. नंतर काव्यसंमेलनास सुरुवात करण्यात आली, या निमंत्रित काव्य संमेलनासाठी प्रत्येक तालुक्यातून निमंत्रित कवी आले होते. त्यामध्ये गंगाधर साळवी, हेमंत बारटक्के, कवी व्याख्याते प्रणय इंगळे, आशिष पाटील, कवी, व्याख्यते मंगेश कंक, उमेश जाधव, प्रिया शहा यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. राजेंद्र जाधव यांनी सुद्धा कालव्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर आपली कविता सादर केली. त्यामध्ये नदी व कवी ही मंगेश कंकांची कविता तसेच छ शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. लगेचच गझल मुशाऱ्याचे आयोजन करण्यात आले.
या गझल मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान गजलकार ज्योत्स्ना रजपूत यांनी स्विकारले. गझलकार सिद्धेश लखमदे, तेजस पाटील, नागेश नायडू, मनाली कोनकर, प्रतीक्षा नगरकर, संध्या दिवकर, ज्योती शिंदे, इत्यादींनी आपल्या दिलखुलास शैलीत गजलांचे सादरीकरण करून एक वेगळा पायंडा पाडला. युवक गजलकार तेजस पाटीलने आपल्या गजलेने सर्वांचे मन जिंकून घेतले. गजल मुशायऱ्याचे अध्यक्षीय भाषण ज्योत्स्ना रजपूत यांनी केले आपली बाप ही गझल आज प्रथमच त्यांनी सर्व रसिकांसमोर सादर केली आणि सर्व रसिकांचे डोळे पाणावले. सुधीर शेठ यांनी नियोजनबद्ध सोहळ्याचे तोंड भरून कौतुक केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले आणि हा सुंदर दृष्ट लागण्यासारखा कवितांचे चांदणे कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आयोजन सुखद राणे आणि विजय दिवकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खजिनदार हणमंत शिंदे, आरती धारप, निकीता बोथरे,नारायण पानवकर, शरद कदम, नेहल प्रधान, पत्रकार सचीन साळुंके, राजेंद्र जाधव, उपसचीव सुधीर क्षिरसागर, भरत चौधरी, अजीत पाशिलकर, वृद्धी भगत, ज्योती शिंदे, सुचीता तटकरे, स्वराज दिवकर इत्यादीनी विशेष मेहनत घेतली, असे संध्या दिवकर यांनी सांगितले .





