मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांविषयी मराठा समाजाच्या मनामध्ये तीव्र भावना आहेत. त्यातच आता हिंगोलीच्या खासदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रामध्ये म्हटलंय की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
असं पत्र लोकसभा अध्यक्षांच्या नावे रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी खासदार हेमंत पाटील यांनी लिहिलं आहे. मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत चर्चेची दारं खुली केली आहेत. जरांगे म्हणाले की, मी दोन दिवस बोलू शकतो. त्यामुळे दोन दिवसांमध्ये सरकारने मातब्बरांना चर्चेसाठी पाठवावं. नाहीतर परिस्थिती अवघड होईल. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.





