मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, असं म्हणत पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, कोविड काळात महाराष्ट्रात लोकांना उपचार मिळत नव्हते. तेव्हा तुम्ही प्रेतांसाठीच्या बॅगामध्येही घोटाळे केले, कोविड सेंटर उभारणीत कुणी लोणी खाल्लं हे लोक विसरले नाहीत. कट कमिशनवर तुम्ही केलेल्या औषध घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे, अशी टीका भाजपने केली. भाजपकडून यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करण्यात आली आहे.
तुम्हाला हनुमान चालीसाबद्दल ॲलर्जी आहे म्हणून तर हनुमान चालीसा म्हणाऱ्यांना तुरुंगात डांबलं आणि आता व्यंकटेश स्तोत्र आठवत आहे. आम्हाला आज समर्थांची आठवण झाली, त्यांनी तुमच्यासाठीच लिहून ठेवलं असावं,
आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति | सांगे वडिलांची कीर्ती | तो येक मूर्ख || , असं म्हणत भाजपने निशाणा साधला.
यापुढे तुम्ही मोदीजींवर टीका केल्यास याच शब्दात तुमचा उद्धार केला जाईल. उद्धवजी एक सांगतो, तुम्हाला आता तुमचे सहकारी सुद्धा कंटाळले आहेत. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा एकही माणूस शिल्लक राहणार नाही . मी आणि माझे कुटुंब हेच तुमचे विश्व आहे आणि तेच राहील, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंवर करण्यात आलीये. दरम्यान, शिवर्तीर्थावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींची तुलना हिटलरशी करत ते म्हणाले की, भाजपचं सरकार नक्की जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणावी. मुंबई लुटण्याचा डाव केंद्र सरकारकडून सुरु आहे.





