मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफितीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बालभारतीच्या ५६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात केसरकर बोलत होते.
शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटनही केसरकर यांच्या हस्ते झाले.





