सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय संरक्षण भिंत धोकादायक असल्याबाबतचे पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषद, बांधकाम विभाग, तहसीलदार ऑफिस व प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदन दिली होती. परंतु अद्यापही कुठचेही प्रकारची कार्यवाही झाली नाही. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी नजीक संरक्षक भिंत आहे. ती भिंत अतिधोकादायक अवस्थेत असल्याने कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदरच्या भिंती ला लागूनच रुग्णालयात येण्याचा मुख्य रस्ता आहे. तसेच अत्यावश्यक सेवेचे कॅज्यूलिटी कक्ष असल्याने रुग्णवाहिका येत जात असतात. प्रशासन सदरची भिंत पडून कोणाचा अपघाती बळी घेण्याची वाट बघत आहे का?, जर अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी अशी अतिधोकादायक भिंत ठेवणे म्हणजे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मृत्यूचा सापळा लावल्यासारखे आहे. परतीच्या पावसामध्ये या भिंतीपासून दुर्घटना होण्याची संभावना आहे, तरी सदरची भिंतपासून दुर्घटना होण्याअगोदर ती पाडण्यात यावी, अशी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ व सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे.






