मुंबई : राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यावर आता एकेमकांना सभेतून उत्तर दिले जात होते. मात्र आता शरद पवारांची जिथं सभा होईल तिथं सभा न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय अजित पवार गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांचे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात येणार असल्याची सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटातील मंत्र्यांना पक्षातील आमदारांची खात्यांसंदर्भातील कामे तत्काळ करून देण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना देण्यात आली आहे. उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटनेवर आणि तळागाळातील मतदार पक्षासोबत जोडण्यावर भर देण्याचा अजित पवार गटाने निर्णय घेतला आहे. तालुका, विभागीय मेळावे घेणे, जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यावर भर देण्याच्या मंत्र्यांसह आमदारांना सूचना देण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राज्यभरात सभा होत आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये नवे कार्यकर्ते पक्षात घेणे, विद्यमान नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या असणार आहेत.
कोणावर कोणती जबाबदारी?
- अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
- प्रफुल पटेल -भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर.
- छगन भुजबळ -नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
- दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा.
- हसन मुश्रीफ -कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर.
- धनंजय मुंडे -बीड, परभणी, नांदेड आणि जालना
- संजय बनसोडे – हिंगोली, लातूर आणि धाराशीव.
- आदिती तटकरे -रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर
- अनिल पाटील – जळगाव, धुळे आणि नंदुरबार
- धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी.
- निवडणूक आयोगात पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला –
राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. पुढची सुनावणी ही 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादीत आतापर्यंत लोकशाही मार्गाने काम होत नव्हतं, शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. ज्या लोकांची शरद पवारांनी (Sharad Pawar) नियुक्ती केली त्याच पवारांनी त्यांची नियुक्ती कशी काय केली असा प्रश्नही अजित पवारांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच सर्वाधिक आमदारांची संख्या आपल्यामागे असल्याचं सांगत पक्षही आपलाच असल्याचं अजित पवार गटाने युक्तिवाद केला.





