श्रीहरिकोटा : 22 सप्टेंबर रोजी चंद्रावर सूर्योदय झाल्यानंतर ‘चांद्रयान-3’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील अशा आशा होत्या. मात्र, आता चंद्रावर पुन्हा सूर्यास्त झाल्यामुळे या आशाही मावळल्या आहेत. 30 सप्टेंबर रोजीच शिवशक्ती पॉइंटवरील सूर्यप्रकाश नाहीसा होण्यास सुरुवात झाली होती. आता चंद्रावर पुन्हा रात्र झाली आहे.चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर ज्याठिकाणी उतरलं होतं, त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट नाव देण्यात आलं होतं. हे ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. चंद्रावरील रात्री याठिकाणचं तापमान हे उणे 180 ते उणे 250 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे याठिकाणी असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस फ्रीज होतात. ही रात्र पृथ्वीवरील 14 दिवसांची असते, त्यामुळे पुन्हा हे डिव्हाईस सुरू होण्याची खात्री देता येत नाही.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचं लँडिंग चंद्रावरील सूर्योदयाच्या वेळी करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील 14 दिवस त्यांनी नेमून दिलेलं काम पूर्ण करत ही मोहीम फत्ते केली होती. यानंतर 4 सप्टेंबर रोजी हे दोन्ही डिव्हाईस स्लीप मोडवर टाकण्यात आले होते. ही दोन्ही उपकरणे सोलार-पॉवर्ड असल्यामुळे पुढे ती सुरू होतील किंवा नाही याची खात्री देता येत नव्हती.
22 सप्टेंबरला चंद्रावर पुढील सूर्योदय झाल्यापासूनच कौरोउमध्ये असणाऱ्या युरोपियन स्पेस स्टेशनवरुन आणि इस्रोच्या टेलिमेट्रीवरुन चांद्रयान-3 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, याला य़श मिळालं नाही. आता चंद्रावर पुन्हा रात्र झाल्यामुळे चांद्रयान-3 जागं होण्याची शक्यता जवळपास शून्य झाली आहे.
मोहीम यशस्वी –
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागं होण्याची शक्यता नसली, तरी ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली असल्याचं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत सूर्य-चंद्र अस्तित्वात राहतील, तोपर्यंत विक्रम आणि प्रज्ञान हे भारताचे दूत म्हणून चंद्रावर राहणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.





