आठवड्यातून २ दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार.! – शिक्षण मंत्री दीपक केसरकर. ; मळगाव येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात, अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

49

सावंतवाडी : माझ्या सावंतवाडी मतदार संघातील जनतेला वेळ देता यावा, यासाठी शनिवार, रविवार हे दोन दिवस आपण मतदारसंघात उपस्थित राहणार असून आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मळगाव येथे केले. महाराष्ट्रात जनतेचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जातानाच विकासाचे अनेक प्रकल्प येणार आहेत. यातून जनतेचे समाधान झाले पाहिजे, यासाठी मी आठवड्यातून दोन दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी मळगाव येथे हाॅटेल शालू येथे पार पडला. या कार्यक्रमात उपस्थितांना मंत्री केसरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हा प्रमुख ॲड. निता कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सुनील डुबळे, बाळा परब, प्रेमानंद देसाई, विनायक दळवी, राजू निंबाळकर, अनारोजीन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, तानाजी वाडकर, बाबू कुडतरकर, श्रृतिका कुबल, सचिन वालावलकर, शर्वरी धारगळकर, उत्कर्षा गावकर, बाळा शिरसाट, सपना नाटेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, मंत्री केसरकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा विचार घेऊन विकासात्मक घोडदौड करत आहेत. हिच घोडदौड कोकणातही पाहायला मिळेल. त्यामुळे बाळासाहेबांचे हे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा. माझ्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये भजनी मंडळांसाठी भजनी साहित्य वाटप केले होते. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे साहित्य वाटप केले जात आहे, याचा लाभ जास्तीत जास्त भजनी मंडळाने घ्यावा. आगामी गणेश चतुर्थी काळात गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार आहेत.  त्यांचे स्वागतही शिंदे सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

या मेळाव्या दरम्यान पक्षासाठी अहोरात्र काम करणारे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मंत्री केसरकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले.