संगीत क्षेत्रावर शोककळा ! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन.

55

हैदराबाद : शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले आहे.  त्या ग्वाल्हेर घराण्यातील  शास्त्रीय गायका होत्या. मालिनी राजूरकर यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी 5:30 ते 6:30 या वेळेत  दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. मालिनी राजूरकर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

राजस्थानमध्ये गेले बालपण

मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण  राजस्थानमध्ये गेले. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये गणित शिकवल्या. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.

संगीत महोत्सवात सादर केली कला

मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांमध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली.

मालिनीताईंचे टप्पा आणि तराना या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’ ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते लोकप्रिय ठरली.

मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी आणि  कुमार गंधर्व यांचा प्रभाव होता. त्यांनी 1980 साली अमेरिकेत आणि 1984 साली इंग्लंडमध्ये संगीत दौरे केले होता.1970 पासून त्या हैदराबाद येथे राहात होत्या.

मालिनीताईंना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2001 मध्ये  संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2008 मध्ये त्यांना  दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने  गौरवण्यात आले होते. बागेश्री, यमन आणि मारवा इत्यादी रागांचे त्यांनी गायन केले. मालिनी राजूरकर यांच्या निधनानं संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.