कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये आज शरद पवारांची सभा सुरु आहे. यावेळी रोहित पवारांनी पक्षातून दुरावलेल्या अजित पवार गटावर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे वटवृक्ष आहेत असं म्हणत त्यांनी पुरोगामी विचार रुजवण्यासाठी काम करत असल्याचं स्पष्ट केलं.
रोहित पवार बोलताना म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजातील घटकांना शिकता यावं, यासाठी वसतिगृह बांधलं.. समतेचा विचार देशाला दिला. तोच विचार संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आपल्याला ताकदीने उभं राहून लढलं पाहिजे.छोट्या जागेवर सभेचं आयोजन का केलं? असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला होता. त्यावर रोहित पवार उपस्थितांना म्हणाले की, हे तुम्हाला हे मान्य आहे का? दसरा चौकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. इथूनच चांगल्या कामाची सुरुवात होते. त्यामुळे येथे सभेचं आयोजन केलं आहे. कोल्हापूरकरांनी ठरवलंतर ते करुनच दाखवतात. जे लोक विचार बदलून पुढे गेले आहेत त्यांचं काय करायचं, हे कोल्हापूरकरांना माहिती आहे असंही पवार म्हणाले.
वटवृक्षाचा नाद करायचा नाही- रोहित पवार
रोहित पवार पक्षातून दुरावलेल्या अजित पवार गटाला उद्देशून म्हणाले की, वटवृक्षाला असलेल्या पारंब्या बलाढ्य शक्ती काढत आहे. त्यांना वाटतं की पारंब्या काढल्या की वटवृक्ष कमकुवत होईल. पारंब्या खोल गेलेल्या आहेत त्या पारंब्यांनाही वाटतंय की, वटवृक्ष पारंब्यावर अवलंबून आहे. परंतु ते विसरले आहेत की वटवृक्षाची ताकद फार मोठीय. या वटवृक्षाचा नाद कुणीही करायचा नाही. रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीच, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, राजकारणामध्ये मी जागा घेण्यासाठी आलेलो नाही. शिव-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना ताकद देण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे. मी जागा घेण्यासाठी आलेलो नाही तर प्रतिमागी विचारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी राजकारणात आलेलो आहे. पुरोगामी विचारांना तडा देण्याचं काम भाजप करत आहे. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे, असंही शेवटी ते म्हणाले.





