अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार! ; कोळसा भट्टीत टाकलं अन्….

126

जयपूर : देशात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह कोळसा भट्टीत जाळण्यात आल्याचं सांगितलं जातंय. सदरच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तीन लोकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांकडून त्यांना या घटनेची माहिती मिळाली. मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. काही तासांच्या शोधानंतरही ती सापडली नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मुलीच्या भावाच्या म्हणण्यानुसार, मुलगी सकाळी गायीगुरांना चरण्यासाठी बाहेर घेऊन गेली होती. त्यानंतर ती सायंकाळपर्यंत घरी आलीच नाही. सायंकाळी गायीगुरे परत आली पण ती आली नाही. त्यामुळे आम्ही तिचा शोध सुरु केला, असं भावाने सांगितले. पोलिसांनी याप्रकरणात नृसिंहपुरा गावातील तीन लोकांना अटक केली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत मुलीचा शोध सुरु होता. नंतर एका कोळसा भट्टीमध्ये कुटुंबियांना काही मानवी हाडे दिसून आली. पाऊन पडत असताना ही कोळसा भट्टी जळत होती. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिन्ही लोकांनी आपल्या कुटुंबियांसमोर मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याचे कबुल केले होते.
पोलिसांनी याप्रकरणात आतार्यंत तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन मुलीचे ब्रेस्लेट आणि चप्पल मिळाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फोरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली आणि भट्टीमध्ये मिळालेल्या हाडांची डिएनए चाचणी केली जाणार आहे. अद्याप याचा रिपोर्ट आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. घटनास्थळी राजस्थान गुर्जर सभा आणि भाजपचे काही कार्यकर्ते पोहोचले होते, त्यांनी याप्रकरणी सत्ताधारी पक्षावर टीका केली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.