मुंबई: मुंबईसह राज्यभरात जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस मागील आठवड्यापासून सक्रिय झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पेरणी झाल्यानंतर ग्रामीण भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता. पण पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लक्षणीय बाब म्हणजे २७ जुलै रोजी कोकणातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यांत उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रायगड या पाच जिल्ह्यांत २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार आहे, अर्थात ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, येत्या चार- पाच दिवस पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.





